नवी मुंबई प्रतिनिधी | Indiancorruption.in
राज्यातील पोलीस दलात नियमित बदल्या होत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी मात्र वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यामुळे “नवी मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा विसर पडला का?” असा सवाल आता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांच्या सेवेत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील नियमित बदल्या होत असतात. मात्र, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील काही वरिष्ठ अधिकारी बदलीची मुदत संपल्यानंतरही त्याच पदावर कायम असल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अनेक आयपीएस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बदली लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांमध्ये आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, निवृत्तीपर्यंत काही अधिकारी एकाच ठिकाणी कार्यरत राहणार का? तसेच प्रशासकीय पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी नियमित बदल्या आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.








